ज्यांना चर्चाच होऊ द्यायची नाही, त्यांचा बंदोबस्त जरांगे पाटलांनी करावा; मंत्री विखे पाटील

विद्यार्थी आंदोलनात राजकीय घुसखोरीचा आरोप; शिर्डीतील गुन्हेगारीवरही कठोर कारवाईचे संकेत : विखे पाटील

SHARE:

शिर्डी, दि. २३ (प्रतिनिधी):- जंतर मंतर मैदानावर शांततामय मार्गाने सुरू असलेले आंदोलन राजकीय पक्षाच्या घुसखोरीने बदनाम झाले आहे. आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या राजकीय पक्षांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहायला हवे, सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार आहे. ज्यांनी जनाधार गमावला तेच आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेऊन नौटंकी करण्याचे काम करीत असल्याची टीका जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना केली.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात नाही. नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने सर्व चौकशी करून, संबंधितंवर कारवाई करून अटक केली. त्यानंतर पुन्हा शांततामय मार्गाने परीक्षाही झाल्या. नव्याने घेतलेल्या परीक्षेबाबत कोणाचीही तक्रार नाही. या परीक्षेमध्ये सरकारने पूर्णपणे पारदर्शकता आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. नीट परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने कोचिंग क्लास चालविणारेच समोर आले, असे स्पष्ट करून या विरोधातील कारवाई सरकारने कुठेही थांबविलेली नाही. यापूर्वीही देशात असे प्रकार घडले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बदनाम करण्याचे काम सुरू झाले आहे. या आंदोलनात राजकीय पक्षांसह काही घुसखोर आल्याने आंदोलनाला गालबोट लागले. पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले झाले, हिंसक मार्गाचा स्वीकार झाला. यामागे पूर्णपणे षड्यंत्र असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेऊन जनाधार गमावलेले नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याची टीका करून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मूळ हेतू यामुळे बाजूला गेला आहे. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण देऊन नुकसान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. जनताही यांना धडा शिकवेल, असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, सरकारची भूमिका ही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची आहेच; मात्र ज्यांना चर्चाच होऊ द्यायची नाही, त्यांचा बंदोबस्त जरांगे पाटलांनी करावा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपोषणाची भूमिकाही तीच आहे. त्यांनी सुद्धा राजकीय पक्षांना अधिकारवाणीने सल्ला द्यावा, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

“जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून, जिल्ह्याला अधिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. अमली पदार्थ तस्करीचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनास सर्वाधिकार दिले असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डीतील ॲपे रिक्षा, भाविकांची होणारी फसवणूक याबाबत स्थानिक पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले असून, पोलीस प्रशासन, शिर्डी संस्थान, नगरपरिषद आणि ग्रामस्थ यांनी योग्य समन्वयातून गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.”

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!