नगर दर्शन (वृत्तसेवा):- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला तरी त्याचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम करतो, हे या पथनाट्यातून प्रभावीपणे मांडण्यात आले.
मोबाईलच्या सततच्या वापरामुळे वाढणारी एकाग्रतेची कमतरता, डोळ्यांचे आजार, झोपेचा अभाव, कुटुंबापासून दूरावलेपण तसेच सामाजिक नातेसंबंधांवर होणारा परिणाम याचे वास्तववादी चित्रण विद्यार्थ्यांनी केले. पथनाट्यातील संवाद, अभिनय आणि संदेश उपस्थित पालक, शिक्षक व नागरिकांच्या मनाला भिडणारा ठरला.
या उपक्रमातून “मोबाईलचा वापर गरजेपुरता करा, जीवनाचा नाही” असा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक केले.
लिटल फ्लॉवर स्कूलच्या या उपक्रमामुळे प्रजासत्ताक दिन केवळ उत्सव न राहता सामाजिक प्रबोधनाचा एक प्रभावी माध्यम ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.







