नगर दर्शन (वृत्तसेवा):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा भव्य समारोप मध्यप्रदेशातील महेश्वर येथे उत्साहात पार पडला. पाच दिवसांचा सुमारे ८५० किमी प्रवास पूर्ण करून आलेल्या या यात्रेत महाराष्ट्रातील १३० नद्यांचे पाणी नर्मदेत विसर्जित करण्यात आले.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले की, या जलयात्रेमुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांचे नाते अधिक दृढ झाले असून अहिल्यादेवींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी महाराष्ट्राला देशाला दिशा देणारी भूमी असल्याचे गौरवोद्गार काढले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, या यात्रेमुळे जलसंवर्धन आणि पर्यावरणाबाबत मोठी जनजागृती झाली असून ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक चळवळ ठरली.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जलयात्रा महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची असल्याचे सांगत तिच्या व्यापकतेचे कौतुक केले.
नर्मदा घाटावर मंत्रघोष, महाआरती, नर्मदाष्टक आणि जयघोषाच्या वातावरणात समारोप सोहळा पार पडला. यावेळी होळकर घराण्याचे युवराज यशवंतराव होळकर, केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, राम शिंदे, जयकुमार रावल, शंकर लालवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.या जलयात्रेमुळे जलसंवर्धन, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचल्याची भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.







