नगर दर्शन (वृत्तसेवा):- पाथरे बुद्रुक (ता. राहता, जि. अहिल्यानगर) येथे सोमवारी (दि. ३० मार्च) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे विजेची तार तुटून थेट गाईच्या गोठ्यावर पडल्याने ९ गायींचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना संजय भास्कर घोलप व सोपान लक्ष्मण घोलप (रा. पाथरे बुद्रुक) यांच्या गोठ्यात घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत शेतकरी संजय घोलप यांचे अंदाजे ७.५ ते ८.५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा हा गंभीर परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित वीज वितरण विभाग व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून, पीडित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






